परंडा (माझं गांव माझं शहर ) शहरासह जिल्ह्यातील हिंदू- मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान हजरत खॉजा बद्रोद्दीन शहीद चिश्ती यांचा वार्षिक उरुस संदल गुरुवारी (ता. ९) साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर परंडा पोलिस ठाण्यात झालेल्या शांतता बैठकीत संदल उरुसबाबत शहरातील उपाययोजनांविषयी आढावा घेण्यात आली. या अनुषंगाने महावितरण विभागाच्या वतीने मंडई पेठेतील धोकादायक विजेचा खांब हटवून नवीन खांब मंगळवारी (ता. ७) उभारण्यात आला. तर दर्गा रोड, काशिमबाग येथे जीर्ण विजेचे खांब बदलण्याचे काम ही सुरू आहे. शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही संदल उरुस मिरवणूक गुरुवारी होत आहे. सध्या उरुसाची शहरात जय्यत तयारी सुरू आहे. सलग पाच दिवस उरुसाची परंडा शहरात धामधूम सुरु असते. या उरुसासाठी नातेवाईक पै पाहुण्यांसह भाविक, नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. त्यामुळे मोठी गर्दी होते. मागील गणेशोत्सवात अडीअडचणी, समस्यांबाबत वेळोवेळी शांतता कमिटीच्या बैठकीत नागरीकांनी तक्रारी केल्या होत्या; मात्र याबाबत नगरपालिका प्रशासन, महावितरण विभागाने कायम दुर्लक्षच केले आहे. शहरातील प्रमुख अंतर्गत रस्ते नेहमी शहराची व गावची अवकळा सांगत आहेत. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. मुख्य मंडई बाजारपेठेतील रस्ता दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाने डोळेझाक केल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याच मंडई पेठेतील जीर्ण झालेला धोकादायक विजेचा खांब हटविण्यात आला आहे. शहरात ठिकठिकाणी लोंबकळणाऱ्या तारा विजवाहिन्यांच्या युध्दपातळीवर दुरुस्ती सुरु आहे. महावितरणचे सहाय्यक अभियंता अंकुश जाधव यांच्यासह वीज कर्मचारी, कामगार वीजवाहिन्या जोडण्याच्या कामी व्यस्त आहेत. नगरपालिका प्रशासनाने तात्काळ उरुस संदल मार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.