पुणे दि. 25- पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार हे अत्यंत कर्तव्यदक्ष – संवेदनशील अधिकारी आहेत. त्यांच्या गेल्या 30 वर्षांच्या कार्यकाळामध्ये कोणत्याही नागरिकाने त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची साधी तक्रार सुद्धा केलेली नाही. लोकांमध्ये मिसळणारे- सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवणारे आरोग्य अधिकारी म्हणून ते महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध आहेत. कर्तव्य बजावत असताना प्रसंगी कठोर भूमिका घेऊन बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही अशाच बेशिस्त लोकांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या खोट्या तक्रारींच्या आधारे त्यांच्यावर जाणून-बुजून निलंबनाची कारवाई कोणी केलीय ? हे सर्वसामान्य जनतेला माहित आहे. मंत्रीपदावर बसलेल्या नियमबाह्य काम करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार का? असा उलटप्रश्न पुणेकर नागरिक आता विचारत आहेत.
मुजोर मंत्र्यांनी बस म्हटले की बसले पाहिजे, उठ म्हटलं की उठले पाहिजे, असे लाचार आणि गुलाम अधिकारी आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मात्र कर्तव्यदक्ष राहून कोणाच्याही दबावाला बळी न पडणारे डॉ. भगवान पवार यांच्यासारखे अधिकारी मात्र मंत्र्यांना खूपतात आणि त्यांच्यावर कोणतेही पुरावे नसताना खोटे बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप करून डॉ. भगवान पवार यांना समाजात बदनाम केले जात आहे. ही बाब पुणेकर नागरिकांना अजिबात पटलेली नाही.
डॉ. भगवान पवार यांच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून जर तक्रारी प्राप्त होत होत्या तर त्यांना सातारा जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी तसेच पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी आणि पुणे महानगरपालिकेचे आरोग्यप्रमुख अत्यन्त म्हणून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या का दिल्या गेल्या? मंत्र्यांनी जनतेला मूर्ख समजणे आता बंद करावे.
कोविड 19च्या संकट काळातील साथ उद्रेकांमध्ये डॉ. भगवान पवार यांनी पुणे जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी म्हणून उत्तम कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आरोग्य सेवा आयुक्त तसेच पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांना अनेक पारितोषिके देखील मिळालेली असताना केवळ जुन्या तक्रारी अर्जांच्या आधारे चौकशी समिती गठित करून डॉ. भगवान पवार यांना कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता त्यांच्यावर तडकाफडकी केलेली निलंबनाची कारवाई अत्यंत चुकीची आहे. डॉ. भगवान पवार यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे सर्वसामान्य पुणेकर नागरिकांमध्ये मोठ्या संतापाची लाट आहे. जर त्यांचे निलंबन रद्द केले नाही तर पुढील काळात पुणेकर नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष उमेश चव्हाण, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास पासवान ) पक्षाचे शहराध्यक्ष संजय अल्हाट, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कदम, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे, रुग्ण हक्क परिषदेच्या शहराध्यक्ष सौ. अपर्णा मारणे साठ्ये, मा. सहा. पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख डॉ. अमोल देवळेकर यांनी दिला. डॉ. भगवान पवार यांच्या पाठीशी पुणेकर जनता आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.